"माजी विद्यार्थी मेळावा - अरुणोदय" माझ्या नजरेतून
गेल्या दीड दोन महिन्यांपासून ज्याची चर्चा आणि तयारी आपण करत होतो तो "माजी विद्यार्थी मेळावा" २५० हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात आणि ४०+ शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत जोरदार संपन्न झाला.
बऱ्याच वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने गप्पांना, थट्टा मस्करीला उधाण आलं होतं. जुन्या बाई-सर भेटले की त्यांच्याशी बोलायला, नमस्कार करायला आणि स्वची (सेल्फी) काढायला प्रत्येक गटाची गडबड बघण्यासारखी होती. त्यात बाईंनी एखादी जुनी आठवण सांगितली की सातमजली हास्याचा कल्लोळ उठत होता. "शाळेतल्या बाई भेटणं", "सर भेटणं" याचा आनंद तर अवर्णनीयच. मला गंमतीने असं वाटलं की त्या समाधानाचे पण वेगवेगळे स्तर होते. पास क्लास,सेकंड क्लास इ.
- बाई माझ्याकडे बघून हसल्या,म्हणजे त्यांनी मला ओळखलं. सेकंड क्लास !!
- बाईंनी मला नावानिशी ओळखलं - फर्स्ट क्लास
- नुसतं नावच नाही तर मी केलेल्या खोड्या, बक्षीस , काहीतरी किस्सा पण सांगितला - फर्स्ट क्लास विथ distinction
विद्यार्थ्यांची कटाऊट आणि फेसबुक खिडकीतले फोटो यातून त्यात वेगळीच मजा आणलेली. उकाड्याने हैराण झालो तरी घाम पुसत, पंखे आपल्याकडे फिरवत, पाणी पीत मजा घ्यायला आपण तयार होत होतो.
शाळेत असल्या छोट्या अडचणींची आपल्याला सवय होती, या निमित्ताने ती पण आठवण जागी झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कुणी रागावणार नाही. मिसळपाव खाताना आणि पन्हे पिताना शाळेतला "अल्पोपहार" सुद्धा आठवला.
(फोटो मोठे करण्यासाठी त्यावर क्लिक करून मग झूम करा )
माजी विद्यार्थ्यांनीच गाणी सादर केली पण बिचाऱ्यांना गप्पा-गोंधळ याच्या वर कडी करत गावं लागलं. त्यांनीही समजून घेत सादरीकरण केलं.
विद्यार्थ्यांची बाईंना भेटण्याची लगबग बघितली, तशी बाईंच्या डोळ्यातली सामाधानाची ओलसर झाकही तुमच्या नजरेतून सुटली नसेलच.
"तुमच्या सारखे जीव लावणारे, बाईंशी ओळख ठेवणारे, त्यात आनंद मानणारे विद्यार्थी हेच आमचं ऊर्जास्थान" अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्यावर मूठभर मांस चढल्याशिवाय राहत नाही. आणि "हल्ली असे विद्यार्थी मिळत नाहीत" ही कांबळे बाईंची खंत व "तुम्ही तरी तुमच्या मुलांना तुम्ही हे संस्कार पुढे दिले पाहिजेत" हे त्यांचं सांगणं जबाबदारीही खांद्यावर टाकतं. ही जबाबदारी आपण आनंदाने घेऊ या विषयी मला, तुम्हाला आणि बाईंनाही शंका नसणार.
शिक्षकांइतकीच आपुलकी किशोर दादा, सुनील दादा, पवार बाई यांच्याबद्दल सगळ्यांना होती. ज्ञानाबरोबरच शाळेच्या प्रत्येक घटकाने मायेचे संस्कारही आपल्यावर केले आणि आपण ते जपलेत याचंच हे द्योतक आहे.
विद्यार्थ्यांचा कल्ला आणि शिक्षकांना दुसऱ्या शाळेत जायची धावपळ या मुळे कार्यक्रम ठरलेल्या सूत्राप्रमाणे झाला नाही. बऱ्याच गोष्टी पुढे मागे झाल्या. पण ज्याचे साठी केला होता अट्टाहास तो विद्यार्थी आणि शिक्षक भेटीचा आनंद आपण पुरेपूर अनुभवला. शिक्षकांनाही या निमित्ताने जुन्या सहकाऱ्यांची थेट भेट घ्यायला मिळाली. कुलकर्णी बाई, परळीकर बाई, कांबळे बाईंना आपलं मनोगत सादर करता आले. धारप बाईंना आपली कविता सादर करता आली. ७० च्या दशकातले पहिल्या बॅचचे विद्यार्थी पण आवर्जून उपस्थित होते. त्यांनी पण आपलं मनोगत सादर केलं.
एकूण समारंभ एखाद्या सरकारी किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमाप्रमाणे नीटनेटका नाही झाला पण "घरच्या कार्या"सारखा "गोड", "आपला" झाला. मनात कायम रेंगाळेल असा झाला. आणि तो तसाच झाला हेच बरं झालं. आपल्याला काही "भव्य" करून काही सिद्ध करायचं नव्हतं का दुसऱ्या शाळांशी स्पर्धा करायची नव्हती. पहिल्या बैठकी पासूनच, व्यासपीठावर काहीतरी चाललंय आणि बाकी सगळे गप्प बसून ऐकतायत असं स्वरूप नको ही स्पष्ट भूमिका आपली होती. सगळ्यांना सहभागी होता येईल अस्साच कार्यक्रम हवा होता. गोंधळ झाला नसता तर "सावळागोंधळ" नावाचा छोटा खेळ पण कौस्तुभ ने ठरवला होता. पण आपण अपेक्षित दंगा-धमाल केलीच, न सांगता.
आपापल्या वर्गमित्रांना जमवणे, निधी संकलन आणि प्रत्यक्ष निधी देणे, स्वयंसेवक म्हणून काम यातून आपण सगळ्यांनीच हा जागन्नाथाचा रथ ओढला. त्यासाठी आपले सगळयांचे कौतुक. हा रथ ओढण्यात ज्यांनी विशेष जोर लावला त्या नियोजक गटाचे आपल्या सगळ्यांतर्फे विशेष कौतुक करतो. मी काही बैठकांना उपस्थित होतो आणि माझा भाऊ सक्रिय असल्याने रोज काय काय घडतंय हे कळत होतं. म्हणून मला त्यांचे कष्ट आणि समर्पित भाव जवळून बघायला मिळाला. शनि-रवी तासन्तास बैठका होत होत्याच पण कामाच्या दिवशीही एकत्र भेटणं, चर्चा करणं, बाजारातून आणायच्या वस्तूंची सोय करणं, भेट वस्तूची चौकशी, शिक्षकांना फोन यातही खूप वेळ त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे, क्रम कसा असावा, मानपत्रांवर काय मजकूर असावा, त्याची दृश्य रचना कशी असावी, व्यासपीठाची पार्श्वभूमी काय असावी, त्याची रंगसंगती काय ठेवावी, मंडप कुठे कसा घालावा, त्याची सजावट कशी करावी, छायाचित्रण आधुनिक पद्धतीने कसे व्हावे, सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी काय घ्यावी या प्रत्येक बाबीचा बारकाईने विचार केला गेला. ९२ च्या बॅच पासून अगदी २०१० पर्यंतच्या बॅचचे उत्साही लोक यात होते. प्रत्येकाने आपलं मत मांडले. त्यावर विचारविनिमय होऊन निर्णय घेण्यात आले. "सबका साथ" आपल्या सगळ्यांनीच अनुभवला.
या निमित्ताने आपण शाळेला महागाची सुमारे सव्वा लाख किमतीची एव्ही सिस्टीम देऊ शकण्या एवढा निधी गोळा केला, तेही महिन्याभरात. आमच्या बॅच चा अनुभव सांगायचा तर सुरुवातीला प्रतिसाद फारच थंड होता. एका बैठकीत मी अंदाज दिलेला की आमची फारतर ५ जण येतील आणि ५ हजार जमतील. पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा एकदा संपर्काचा प्रयत्न केला आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 37 जणांनी यायचं कबूल केलं आणि निधीचा आकडा तर आठवडाभरात सत्तर हजाराच्या पार गेला. माझ्या प्रमाणे बऱ्याच बॅचचा हा अनुभव आहे. आणि अजूनही काही विद्यार्थी जे आधी पैसे देऊ शकले नाहीत ते पैसे कसे द्यायचे हे विचारतायत. शाळेसाठी निधी गोळा करायचाय म्हटल्यावर;"का ?" असा प्रश्न मलातरी एकानेही विचारला नाही. हे मला खूप भावलं. पैसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचं संकलन झालं.
शाळेच्या आजी मुख्याध्यापिका परळीकर बाई यांच्या बरोबर बोलणं झालं तेव्हा त्या आपल्या वेळी शाळेत आपल्याला नव्हत्या असं वाटलंच नाही. इतक्या सहजतेने आणि प्रेमाने त्यांचं वागणं होतं. नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांची वेव्हलेंथ लगेच जमली. कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. मुख्य कार्यकर्ते अजून जास्त चांगलं बोलू शकतील या बद्दल. बाईंचे नुसते सहकार्यच नाही तर त्यांनी केलेलं कौतुकही आपल्याला लाभलं. नियोजक विद्यार्थ्यांचे नाव घेऊन आणि ओळख करून देत सत्कार त्यांनी केला.
आपल्या संस्थेत ज्यांनी ही कल्पना मांडली, पुढे आणली , मूलभूत सोयी उपालब्ध करून दिल्या. त्यांचा ही आवर्जून उल्लेख मला करावासा वाटतो. त्यांच्यामुळेच हे निमित्त मिळालं. एकत्र येणं आणि संस्थेला मदत मिळवणं हे दोन्ही उद्देश सफल पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनाही मिळाला असेल असं मला वाटतं.
या निमित्ताने वर्गमित्रमैत्रिणी पुन्हा जोडले गेलो. फोन नंबर मिळाल्याने थेट बोलायची संधी मिळाली. माझा वर्गमित्र माझ्या शेजारच्या इमारतीतच व्यवसाय करतो पण मी त्याला तिकडे कधी बघितलं नव्हतं, कदाचित बघितलं तरी ओळखलं नसतं असा तो दिसण्यात बदललाय. व्हॉटसप ग्रुप वर कोण काय करतंय हे विचारताना तो व्यवसायाबद्दल बोलला. आणि लगेच संध्याकाळी आम्ही भेटलो. "Re-union" शब्दशः अनुभवलं. सगळेच गट आता एकत्र येऊन शाळेसाठी अजून काय करता येईल याचा विचार करतायत. वरचेवर भेटण्यासाठी सहली, बॅचमेळावा, सहभोजन याचेही बेत शिजतायत. त्याचा सुवास दरवळतो आहे.
या मेळाव्यानंतर "पुढे काय" हा प्रश्न खूप माजी विद्यार्थ्यांना आहे. हे चांगलं लक्षण आहे. शाळेला आवश्यक सुविधांसाठी अजून निधी गोळा करून काम करता येऊ शकेल. सगळे माजी विद्यार्थी मिळून किंवा एकाच बॅचचे मिळून किंवा एका क्षेत्रात काम करणारे अनेक विद्यार्थी मिळून असे आत्ताच्या मुलामुलींसाठी काही उपक्रम करता येतील. कल्पना मांडूया आणि त्या प्रत्यक्षात उरवण्यासाठी पुढाकार घेऊया.
मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत आता पुढची निमित्ते आपणच तयार करूया. 26 जाने, 15 ऑगस्ट ला शाळेत झेंडावंदनाला भेटायचं, गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत शाळेच्या चमू बरोबर जायचं असंही आपण करू शकतो. १५ एप्रिल २०१९ ला मागे वळून बघताना
"मेळावा फक्त सुरुवात होती. वर्षभरात आपण कित्ती काय काय केलं!!" हे समाधान सगळ्यांनाच आवडेल ना !!
मग म्हणा ....
"हिप हिप हुर्रे", "हिप हिप हुर्रे" !!
चिली मिली चिली मिली धूम धडाका हू हा हू हा !!
"टीम अरुणोदय" जिंदाबाद !!
"टीम अरुणोदय" जिंदाबाद !!
"टीम अरुणोदय" जिंदाबाद !!
- कौशिक लेले
खूप छान कौशिक, लिहावं तेवढं कमीच 👌👌
ReplyDeleteधन्यवाद. आवडलं हे वाचून बरं वाटलं.
DeleteKhoop chaan lihila aahes..pudhil watchali sathi shubhecchha
ReplyDeleteखूप छान कौशिक असेच लिहीत राहा
ReplyDeleteधन्यवाद.आवडलं हे वाचून बरं वाटलं.
Deleteकौशिक खूप छान लिहिलं आहेस सगळं परत डोळ्यासमोर सुरू आहे अस वाटतं वाचताना.
ReplyDeleteखरं आहे. लिहिताना मलाही ती मजा आली.
DeleteKhup chan :-)
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteSahi kaushik
ReplyDeleteChaan watala wachun..
Shaletale diwas kahi aurach...
Junya Mitra maitrin Ani shikskana bhetana yacha aanand anolka...
Tuzya lihinyatunach samjatay tu ki enjoy kelas te
-Mahesh A
हो. एन्जॉय तर खूपच केलं. धन्यवाद.
DeleteKaushik khup chhan. Would like to share with my other friends too.
ReplyDeletePlease do. Share with as many schoolmates as possible.
DeleteOho...Then I am First Class with Distinction Student
ReplyDeleteGuys,Thanks for organising and Executing the same
You r welcome. Abd congrats for distinction. काय खोड्या सांगितल्या तुझ्या बाईंनी :) :)
DeleteWell written kaushik����, काही कारणास्तव आपल्या शाळेच्या संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, पण तुझ्या या लेखामुळे खरोखरच ते अनुभवता आले हे नक्की☺️ त्यासाठी तुझे खूप खूप आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!!!
ReplyDeleteधन्यवाद. आवडलं हे वाचून बरं वाटलं.
DeleteKhup kami wel shalet hote fakt 5th std paryant pan khup kahi dil ya shalene....ajun pan june mitra sagale jodun aahot...
ReplyDeleteग्रेट !!
Deleteमस्त,कार्यक्रम आणि लिहिलेलंही.
ReplyDeleteधन्यवाद !!
Deleteखूप छान विचार आहे मैत्री कशी असावी तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया सारखीच असते
ReplyDelete